Sunday, August 8, 2010

सूर्याची पिल्ले

सूर्याची पिल्ले --- नाटक तसं जुनच. वसंत कानेटकरांनी लिहिलेलं.

१. ५ एप्रिल १९७८ साली "धी गोवा हिंदु असोसिएशन" प्रथम रंगमंचावर आणलेलं. दिग्गज कलाकारांनी रंगवलेलं. नुसती नावं जरी घेतली तरी कल्पना येते. माधव वाटवे, बाळ कर्वे, दिलिप प्रभावळकर, मोहन गोखले, सदाशिव अमरापुरकर, शांता जोग इत्यादी इत्यादी.
२. व्हीसीडी च्या जमान्यात याच पुर्वीच्या संचात थोडेफार फरक करून सर्वांपर्यंत पोहोचलेलं हे नाटक. कानेटकरी विनोदाची एक वेगळीच मांडणी आणि जातकुळी सांगणारं हे नाटक. काळ बदलला तरी संदर्भ फारसे न बदलल्यामुळे ताजं वाटणारं.
३. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील पहिल्या अशा "आठवणीत रुतून बसलेल्या श्रेष्ठ नाट्यकृतींच पुनर्मंचन" म्हणजेच सुबक निर्मित सुर्याची पिल्ले.

स्वातंत्र्यसूर्य पंजाबराव तथा आबाकाका कोटीभास्कर यांच्या पुण्यतिथीनिमित्त असलेला कार्यक्रम ही या नाटकाची सुरुवात. या आबाकाकांचे ४ चिरंजीव - पांडूअण्णा, बजरंगा, रघुराया आणि श्रीरंगा. स्वातंत्र्यसूर्यांचे वारसदार असल्यामुळे आपणही काही थोर आहोत आणि आपल्याकडून सुद्धा काही दिव्य घडतं आहे ही या पुत्रांची विचारसरणी. अर्थात याला अपवाद म्हणजे श्रीरंगा. आबाकाकांनी सुरु केलेल्या विविध संस्थांचे एकमेव ट्रस्टी जांबुवंतराव ठाणेकर यांच्या मदतीने श्रीरंगा आपल्या इतर भावांना कसं सुधरवतो याची ही कहाणी. याला उपकथानक म्हणून ठाणेदारांची कन्या आणि रघुराया यांचं प्रेमप्रकरण सुद्धा आहे.

आबाकाकांच्या स्मरणार्थ होणार्‍या पुण्यतिथीच्या कार्यक्रमापासून सुरू होणारं नाटक श्रीरंगाच्या वाक्याने शेवटाकडे जातं "आपण जितक्या लवकर आबाकाकांना विसरू तितक्या लवकर आपले पाय जमिनीवर येतील." म्हणजे केवळ आपल्या पुर्वजांच्या पुर्वपुण्याईवर आपण जगू शकत नाही किंवा जगू नये असा काहीसा संदेश या नाटकात आहे.

आज या पुनर्निमित नाटकाचा अकरावा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला. त्यानिमित्ताने नाटका बद्दल आणि नाट्यप्रयोगाबद्दल थोडं काही ........

व्हीसीडी मुळे परत परत बघितलं गेलेलं हे नाटक. ते देखिल दिलिप प्रभावळकर, मोहन गोखले, सदाशिव अमरापुरकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांकडून सादर केलं गेलेलं. त्यामुळे ही नव्या दमाची फौज काय करते ही उत्सुकता होतीच मनामध्ये. कारण शेवटी नविन कलाकारांकडून पाहात असलेल्या नाटकाची कुठेतरी आधीच्या संचाबरोबर तुलना होणं स्वाभाविक होतं. परंतू नाटक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत ही अशी तुलना झालीच नाही, इतकं या नविन मंडळींनी आम्हाला नाटकात गुंतवून ठेवलं.

अर्थात हा नविन संच काही लेच्यापेच्या कलाकारांचा नाहिये. वैभव मांगले, आनंद इंगळे, पुश्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, उज्ज्वला जोग, आतिशा नाईक, उदय सबनिस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षिती जोगच्या आजारपणामुळे आयत्या वेळेस उभी राहिलेली शर्वरी पाटणकर ही या नाटकाची सध्याची टीम. सगळ्यांचीच कामं एकापेक्षा एक सरस.

या पुनर्जिवित नाटकात फक्त कलाकारचं नविन होते असं नाही, तर काही नविन पद्धती सुद्धा अवलंबिल्या गेल्या. निदान माझ्यापुरतं बोलायचं झालं तर या पद्धती मी फारशा काही मराठी नाटकांमध्ये बघितल्या नाहीत. या पद्धती मला तरी भावल्या.

१. साधारणपणे आपण नाट्यग्रूहात गेल्यावर, तिकिट दाखवलं की डायरेक्ट आपल्या सीट्वर जाउन बसतो. पण इथे, नाट्यग्रूहात शिरल्यावर चक्क बायकांचं स्वागत गजरे देऊन आणि पुरुषांचं स्वागत गुलाबाची फुलं देऊन झालं.
२. फुलांचा सुगंध घेत असतानाच तिथे असलेल्या स्वयंसेवकांनी एक पत्रक हातात दिलं. त्या पत्रकात नाटकाबद्दलची माहिती, कलाकारांची नावं त्यांच्या फोटो आणि सही सकट आहेत. मुख्य म्हणजे क्षिती जोग या प्रयोगात काम करणार नाहिये, याची माहिती सुद्धा पत्रकात उपलब्ध आहे.
३. नाटक संपल्यानंतर पडदा पडायच्या आधी, एक एक करून सगळे कलाकार पुन्हा एकदा रंगमंचावर आले, प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी. या इथे सगळ्या टीमबरोबर टीमचा कप्तान उर्फ निर्माता सुनिल बर्वे पण आला.

तिसरा अंक सुरु होण्याआधी सुनिल ने प्रेक्षकांशी संवाद साधत, या उपक्रमाबद्दल अधिक माहिती पुरविली. या एका वर्षात यासारखी अजून ४ नाटकं सुबक तर्फे रंगमंचावर येणार आहेत. प्रत्येक नाटक वेगवेगळे दिग्दर्शक दिग्दर्शित करणार आहेत. प्रत्येक नाटकाचे फक्त २५ प्रयोगच होणार आहेत. अर्थात याबद्दल त्यांची काही गणितं असतील, पण माझ्या सारख्या प्रेक्षकाची एकच अपेक्षा आहे, की या २५ प्रयोगांनंतर या अशा प्रकारच्या नविन संचातील नाटकांचं योग्य ते जतन व्हायला हवं. म्हणजेच याच्या व्हीसीडीज किंवा डिव्हीडीज यायला पाहिजेत.

एकंदरीत २५ प्रयोगांपैकी ११ प्रयोग तरी झालेत. उरलेल्या प्रयोगांमध्ये तुम्हाला चान्स मिळाला तर तो अजिबात चुकवू नका.

Sunday, April 5, 2009

पार्टी

एप्रिल - मे चे दिवस. उन नेहमीप्रमाणे दिवसभर आग ओकत होते. अशाच एका शनिवारी संध्याकाळी गंप्या घरासमोरच्या अंगणात येरझार्‍या घालत होता. चार महिन्यांपुर्वी लग्न झाल्यापासून गंप्याला आपल्या मित्रांबरोबर टाईमपास करायला वेळच असा मिळाला नव्हता. पण आज चान्स होता. बायको दुपारीच माहेरी गेली होती आणि डायरेक्ट उद्या परतणार होती, त्यामुळे आजच्या रात्री मित्रांबरोबर जंगी पार्टी करण्याचा चांगला चान्स होता. पण अंगणात तिर्थरूप आणि किचन मध्ये मातोश्री यांना काय सांगून बाहेर पडायचे याचाच विचार मनात होता.
दुसरं म्हणजे गावात गंप्याचे दोनच मित्र होते, अव्या आणि किश्या. दोघेही अजून बिनलग्नाचेच होते, त्यामुळे त्यांना पार्टीसाठी काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे नसावा, असे गंप्याला वाटले. पण एकदा विचारले पाहिजे म्हणून गंप्याने पहिल्यांदा अव्याला फोन लावला.

अव्या नेहमीप्रमाणे तयारच होता पार्टीसाठी. त्यातच त्याने बातमी दिली, की करोना का कोरोना म्हणून काहीतरी नविन बीयर आली आहे मार्केटमध्ये. मग काय, आजच्या पार्टीत हीच बीयर ट्राय करायचा असा बेत ठरला या दोघांचा. आता प्रश्न होता तो जागेचा. अव्या आणि गंप्याच्या दोघांच्याही घरी शक्य नव्हते कारण दोघांचेही आईवडील घरातच होते. पण किश्याकडे तसा काही प्रॉब्लेम नव्हता, कारण तो एकटाच (P.G.) म्हणून राहत होता. म्हणून मग सगळा स्टॉक घेऊन त्याच्याकडेच जायचं ठरलं.

हे सगळं ठरवलं पण किश्याला जमणार आहे की नाही याचा विचारच आपण केला नाहिये, हे अव्याच्या लक्षात आलं आणि त्याने चटकन किश्याला फोन लावला.
"काय रे मित्रा, आज संध्याकाळचा काय प्लॅन?" अव्या
"अरे जरा कामिनी बरोबर बाहेर जाणार आहे, पण ८ - ८:३० पर्यंत मोकळा होईन" किश्या म्हणाला.
हे ऐकल्याबद्दल चटकन अव्याच्या लक्षात आलं की गेले काही दिवस किश्या या कामिनी नावाच्या नाजूक प्रकरणात थोडासा गुंतला आहे. पण निदान ८:३० नंतर मोकळा होणार आहे, हे ऐकून अव्या निर्धास्त झाला.
"तुझ्या फ्लॅटची ची चावी शेजारी ठेऊन जा रे" अव्याने किश्याला सगळा प्लॅन समजाऊन सांगितला आणि अव्या पुढच्या तयारीला लागला.

बरोब्बर ८ च्या सुमारास गंप्या तयार होऊन बाहेर पडतच होता की इतक्या अव्या बाईकवरून आलाच गंप्याला न्यायला.
"बरं झालं आलास ते. मी विचारच करत होतो, की कसं जायचं किश्याकडे याचा" गंप्या
"मग, यायलाच पाहिजे, आज तुला चक्क आमच्यासाठी वेळ मिळाला आहे ना? वहिनींनी परवानगी कशी दिली?" अव्या ने विचारलं.
"अरे परवानगी द्यायला इथे विचारतय कोण? आज सुलू माहेरी गेलीये म्हणून तर हा स्वातंत्रदिन.
चल निघुया पटकन, नाहीतर आमच्या तिर्थरूपांचे प्रवचन सुरू होइल इथे" गंप्या घाईघाईने म्हणाला.
"हो रे बाबा. ते टीव्हीवरचे बापू परवडले, पण तुमचे तिर्थरूप म्हणजे........ असो" अव्या ने लगेच बाईकला किक मारून बाईक सुरू केली.

वाटेतच पार्टीसाठी लागणारी बीयर आणि योग्य तो चकणा घेऊन ते दोघे किश्याच्या घरी पोचले.
एव्हाना किश्यापण घरी यायला पाहिजे होता. तो अजून आला नव्हता पण शहाण्या मुलासारखं त्याने फ्लॅटची किल्ली शेजारच्या काकूंकडे दिली होती, त्यामुळे अव्या आणि गंप्याचा बाहेर पुतळा झाला नाही.
फ्लॅटमध्ये येताच अव्याने बीयर फ्रीजमध्ये ठेवली, आणि दिवाणखान्यात आला. इथे गंप्याने ऑलरेडी टीव्ही चालू केला होता, आणि कतरिना काकूंचा डान्स बघण्यात गुंग झाला होता.
"आमच्याकडे सध्या हे असले चॅनल्स लागत नाहीत रे" गंप्याने आपले दु:ख अव्यासमोर मांडले.
"अरे रिमोटचा ताबा आपल्याकडे असला ना, म्हणजे सगळे चॅनल्स लागतात बरं" अव्या गंप्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
"तुझं लग्न झालं नाहिये ना म्हणून तू असं म्हणतोयस. लग्न झाल्यावर मग कळेल, की रिमोट कोणाच्या हातात असतो ते." गंप्या थोडा वैतागूनच बोलला.
"अरे पण हा किश्या कसा आला नाही अजून?
किती वेळ वाट पाहायची?
एकतर इतक्या महिन्यांचा उपास, आणि त्यात हा किश्या अजून वेळ घालवतोय" गंप्या आता बीयर पिण्यासाठी अधीर होत चालला होता.
"आपण एक काम करू. आपण सुरुवात तर करू. किश्या आला की तो आपल्याला जॉईन होइल. चालेल का?" अव्याने यावर योग्य तो तोडगा काढला.
"अरे नेकी ऑर पुछ पुछ? चल लगेच सुरू करुया" गंप्या हे बोलत बोलत किचन मध्ये गेला आणि बीयरच्या दोन बाटल्या घेउन आला.
"अरे ग्लास पण आणायचेस ना?" अव्या कावला
"ग्लास कशाला? लाव बाटलीच तोंडाला" गंप्याने आज्ञा केली

प्रत्येकी दोन दोन बाटल्या रिचवून गंप्याने जेंव्हा तिसरी बाटली उघडली, तेंव्हा अव्याच्या लक्षात आलं की अजून किश्या आलेला नाहिये.
"अजून कसा आला नाही रे किश्या" अव्याने गंप्याला विचारले, आणि दिवाणखान्यात फेर्‍या मारू लागला.
"तू एका जागी बस बघू, फेर्‍या मारू नकोस. फेर्‍या मारता मारता कुठल्यातरी बाटलीला धकका लावशील आणी बीयर फुकट घालवशील" गंप्याने अव्याच्या फेर्‍यामारण्याच्या चालीवरून त्याला फटकारले.
"अरे तो बघ, किश्याच येतोय." अव्या एव्हाना खिडकीपाशी पोचला होता, आणि खिडकीतूनच त्याने किश्याला पाहिले होते.
"या किशनमहाराज, कुठल्या राधेला घेऊन प्रणयक्रीडा चालू होती तुमची?" आल्या आल्या किश्यावर गंप्याने प्रश्नाचा भडिमार सुरू केला.
"अरे कुठल्या काय? कामिनीला घेऊन गेलो होतो फिरायला. तिला घरी सोडलं आणि लगेच आलो इथे." किश्याने आज्ञाधारक मुलासारखे उत्तर दिले.
इतक्यात अव्याने आत जाऊन अजून एक बीयरची बाटली आणली आणि किश्याच्या हातात दिली.
"चिअर्स" म्हणत तिघांनीही आपल्या हातातील बाटल्या उंचावल्या आणि प्यायला सुरुवात केली.

इतक्यात दारावरची बेल वाजली.
"आता कोण आलं मरायला?" अव्या आणि किश्या नकळत एकच वाक्य एकाच वेळेस बोलले.
तेव्हड्यात गंप्या उठला आणि त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर एक पन्नाशीचा माणूस एकदम घरात घुसला आणि त्याला पाहून किश्याच्या चेहर्‍यावरचा रंगच उडाला.
"काका तुम्ही?" इतकंच वाक्य किश्या बोलू शकला.
अव्या आणि गंप्याला काहीच सुधरेना, की हा माणूस कोण आहे, आणि किश्या असा का घाबरला आहे.
"काका तुम्ही इथे कसे? तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला? किश्या अजूनही घाबरलेल्या अवस्थेतच होता.
"अरे हे कामिनी दिशपांडे चे वडील" किश्याने हळूच अव्या आणि गंप्यासमोर उलगडा केला.
अच्छा म्हणजे हा काका, कामिनीचा बाप आहे तर. अव्या आणि गंप्याच्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडू लागला होता. पण आता हा थेरडा इथे काय करणार आहे? गंप्याच्या डोक्यात किडा वळवळलाच.

किश्या अजूनही काकांकडेच बघत होता. काय बोलावं हेच सुचत नव्हतं त्याला. शेवटी न राहवून अव्याच म्हणाला, "काका, आत तर या. इथे आजुबाजुंच्या लोकांसमोर नको" तमाशा हा शब्द वापरायचा मोह महत्प्रयासाने टाळून अव्या बोलला.
काका दिवाणखान्यातल्या सोफ्यावर बसले आणि त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली किश्यावर.
किश्या अजून गांगरलेल्या अवस्थेतच होता.
"नाव काय तुमचं?
काय करता?
गंगाविहार सोसायटी मध्ये काय करत होतात?"
ततपप करून काकांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. त्याच्या या गांगरण्यामुळे अव्या आणि गंप्या अजूनच वैतागत होते. पार्टीचा सगळा मूड जात होता. उरत होता फक्त प्रश्नोत्तराचा तास.

गंप्याला वाटलं एकदा चांगलं खडसवावं किश्याला आणि म्हणावं
"अरे बालका, केलं आहेस ना प्रेम कामिनीवर? मग आता कशाला तिच्या बापासमोर घाबरतोस? सरळ सांगून टाक त्याला, की हो आहे माझं कामिनीवर प्रेम".
पण किश्यामध्ये इतका दम नाहिये, हे गंप्याला माहित होतं.
पार्टीचा पुरता सत्यानाश होत असलेला पाहून शेवटी गंप्याला राहावलं नाही, आणि तोच पुढे होऊन म्हणाला
"अहो काका, हे वयच असं असतं. जडतं अशा वेळेस प्रेम एकमेकांवर. त्यात एव्हडं लाऊन काय घ्यायचं मनाला?
हा किश्या काही अगदीच काही हा नाहिये. मनापासून प्रेम करतो तो कामिनीवर." गंप्या काय बोलतोय ते चटकन काकांच्या लक्षातच आलं नाही.
"काय म्हणताय तुम्ही? कोण करतय प्रेम कामिनीवर? मी इथे यांच रस्त्यात पडलेलं पाकिट द्यायला आलो होतो.
"काय?" आश्चर्यचकित होऊन किश्या ओरडला
"हो काय काय? मगाशी तुमची आमच्या घराजवळून जाताना धांदरटासारखे कुत्र्याकडे बघत बघत बाईकवरून पडलात तेंव्हा तुमच्या खिशातलं हे पैशाचं पाकिट पडलं ते द्यायला म्हणून मी तुमच्या मागे येत होतो. बर्‍याच हाका मारल्या, पण तुम्ही काही मागे वळून पाहिलं नाहीत, म्हणून मग इथंपर्यत यावं लागलं मला. " काकांनी सगळा इतिहास कथन केला.

पण या सगळ्यात किश्याचं कामिनीवर प्रेम आहे, ही अंदरकी बात काकांना कळलीच आणी ते पुन्हा एकदा संतापले.
गंप्याला आता आपली चुक समजली होती. त्याच्या गाढवपणामुळेच काकांना किश्या आणि कामिनीच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागला होता. त्यामुळे ती चुक निस्तरायलाच पाहिजे होती पण अर्थात चुक निस्तरायला आता तेव्हडा वेळ नव्हता.

शेवटी अव्या पुढे आला, आणि म्हणाला
"थ्यांकू काका, या किश्याचं पाकिट परत आणून दिल्याबद्दल.
आता इथपर्यंत आलाच आहात तर घेणार का थोडी आमच्याबरोबर?"
या ऑफरचा मात्र काकांनी विनाविलंब स्वीकार केला आणि गंप्याने किचन मध्ये जाऊन अजून एक बाटली आणली.
"चिअर्स" या तिघांबरोबर काकांनी सुद्धा हात उंचावला आणि बीयरचा पहिला घोट घेतला.

Tuesday, March 10, 2009

कर

कर कापलेला, कर वाचलेला
कर दिलेला, कर मारलेला

कर कर म्हणून
काहीच करू नाही दिलं
काहीच न केलेल्या कामाचं
करदायीत्व मात्र कपाळी आलं

कर भरणे ही देशाची सेवा
करामुळे होते देशाची प्रगती
या नसत्या लफड्यापायी
बँकबॅलन्स्ची मात्र होते अधोगती

कर भरावा की न भरावा
नुसत्याच होतात गरम चर्चा
कळत नकळत पेस्लिप मधून
कर होतो मुद्दलातच वजा

म्हणून म्हणतो हे गड्यांनो
कर देणे प्राप्त आहे
आघाडी असो किंवा युती असो
आपल्या करावर त्यांचा डोळा आहे

Tuesday, September 2, 2008

माझ्याच बाबतीत का?

हे सगळं असच फक्त
माझ्याच बाबतीत का घडतं?

चुक कोणाचीही असली तरी
बॉसच्या नजरेत मीच येतो
अगदी रजेवर नसून सुद्धा
कामचुकारीचा शिक्का बसतो

घाईघाईत घरून निघताना
नेमकी बायकोला आठवण येते
सावकाशीने करायच्या कामांची
यादी तत्परतेने सादर होते

बस मध्ये चढल्या चढल्या
बसायला चक्क जागा मिळते
शेजारची सीट रिकामी असूनही
"ती" मात्र दुसरीकडेच बसते

ग्रहतार्‍यांवर विश्वास नसून सुद्धा
भविष्य वाचणे काही चुकत नाही
असल्या नशिबाचा विचार करणे
मान्य नसूनही टळत नाही

Thursday, June 26, 2008

पाऊस

पाऊस आला पाऊस आला
चहु बाजूंनी पुकारा झाला

कधी डोंगरावर तर कधी नदीकाठी
जाणवून देतो अस्तित्व तो
मनाचिया कोंदणी प्रियाच्या
रिमझिम जागवून देतो तो

आठवणींच्या कडेकपारी
पाऊस दाटून राहतो नेहमी
उनाड वारा अन् धुंद हवा
जागवतात नकळत रम्य आठवणी

तसा हा पाऊस नेहमीचाच
पण प्रत्येक वेळी हवाहवासा
असून अडचण नसून खोळंबा
ही म्हण सार्थ करणारा

Tuesday, January 15, 2008

मैत्री

१९८६ च्या जून मध्ये दहावी पास झाल्यानंतर शाळेतील आम्ही सगळे मित्र दहा दिशांना पांगलो. बरोबर २१ वर्षांनंतर गेल्या महिन्यात पुन्हा एकदा भेटलो. त्यानिमित्ताने केलेली ही कविता ...
===============

नविन मित्र नविन जग सगळच नविन होतं तेंव्हा
शाळेच्या उंबरठ्यावरून पाऊल पडलं बाहेर जेंव्हा

नव्या आकांक्षा नवी जिद्द आणि क्षितिजापार दृष्टी
लोभसवाणी तरीही अनोळखी होती ती सृष्टी

तेरा वर्षांच्या शाळेच्या सहवासानंतरची
एका नविन आयुष्याची साहसी सुरुवात होती ती

जुने मित्र मागे राहिले फक्त उरल्या आठवणी
त्याच आठवणींची झाली बहुपयोगी शिदोरी

धडपडलो, ठेचाळलो प्रसंगी यशस्वी सुद्धा झालो
शाळेतील सवंगड्यांची सय विसरू नाही शकलो

आज एकवीस वर्षांनंतर तीच उर्मी पुन्हा दाटून आली
वर्गातील बालमित्रांची नाव धडाधड आठवू लागली

वाटलं यातलं कुणीतरी भेटावं कुणाशीतरी बोलावं
आपलच बालपण पुन्हा एकदा मनसोक्त उपभोगावं

मनातल्या प्रतिमांची उजळणी मनातच होत राहिली
अन अचानक एक दिवस सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली

वयोमानपरत्वे पोटं सुटली, जाडी वाढली
बर्‍याच डोक्यांवरची काळी छप्परं पण उडाली

सारं काही बदललय असं एका क्षणी वाटलं
पण बाहेरच्या ध्यानापेक्षा अंतर्मनच ग्वाही देऊन गेलं

कितीही वर्षं जाऊ देत अथवा लांब असू कितीही
मनामनांच्या या नात्यांची वीण घट्ट धाग्यांची

या विश्वासाची आहे सगळ्यांनाच खात्री
त्यावरच उभारली आहे आम्हा सगळ्यांची मैत्री

Friday, January 11, 2008

रुटीन

नविन वर्ष, नविन महिना, नविन दिवस
म्हणायच आपलं नविन म्हणून
पण आहे सगळे नेहमीचेच
रुटीन कामाचे रात्र अन् दिवस

रोज सकाळी हापिसात पोचायची नेहमीचीच घाई
हापिसात गेल्यावर नेहमीचीच कामाची यादी
आजचं काम उद्यावर ढकलू म्हटलं तर
उद्याच्या कामांची दुसरीच यादी

मीटींग्ज कॉन्फ़रन्सेस अन मुलाखती
यांची न संपणारी नाजूक नाती
दुसर्‍यांचा मूड सांभाळत सांभाळत
आपणच करायच्या या सगळ्या कवायती

बॉसच्या अपेक्षा आणि ज्युनिअर्स च्या आकांक्षा
फायनांस च्या धमक्या आणि एच आर च्या नियमावल्या
या सगळ्या गलबल्यामध्ये हरवल्या आहेत
स्वत:ने ठरवलेल्या स्वत:च्या इच्छा

अशा या रहाटगाडग्यातून
बाहेर पडावेसे वाटत आहे
त्याचाच प्लॅन ठरवण्यासाठी
एक मीटींग शेड्युल केली आहे

मात्र या मीटींग मध्ये
इतर कुणाचाही सहभाग नसेल
मी आणि माझ्या इच्छा
यांचाच फक्त अंतर्भाव असेल